Nashik Potholes: नाशिकचे खड्डे किती मस्त; संकटमोचक पक्षफोडीत व्यस्त

सिडको - 'पंचवटीत आता राम नाही राहिला, गोदाकाठी धावणारा प्रत्येक रस्ता पोटभर वाहिला' या ओळींमधून नाशिकच्या रस्त्यांतील दुर्दशेचा वक्रोक्तीपूर्ण उल्लेख करण्यात आल
सिडको - 'पंचवटीत आता राम नाही राहिला, गोदाकाठी धावणारा प्रत्येक रस्ता पोटभर वाहिला' या ओळींमधून नाशिकच्या रस्त्यांतील दुर्दशेचा वक्रोक्तीपूर्ण उल्लेख करण्यात आला आहे. खड्ड्यांमुळे नागरिकांची होणारी गैरसोय आणि रस्त्यांवरील अपघात याबाबत कवींनी संताप व्यक्त केला. 'खड्यांमुळे सगळेच झालेत त्रस्त, रस्त्यावरील मरण मात्र झालं स्वस्त' या शब्दांतून त्यांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर तिरकस बाण सोडला. नाशिकच्या खड्ड्यांवर आधारित हा कवी संमेलनाचा कार्यक्रम पद्मश्री कविवर्य नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित करण्यात आला होता. या संमेलनात कवींनी हास्याच्या रंगात खड्ड्यांवर उपरोधिक शब्दांतून संताप व्यक्त केला. कवी प्रदीप बगडाणे यांनी 'पंचवटीत आता राम नाही राहिला' या ओळींमधून शहराच्या विदारक अवस्थेचे चित्र उभे केले. खड्ड्यांमुळे नागरिकांच्या जीवितावरही संकट आले आहे, हे त्यांनी आपल्या काव्यातून स्पष्ट केले.
कवी शुभांगी माळी यांनी 'बाबा, लवकर घरी या' या कवितेत खड्ड्यांतून जीव मुठीत धरून प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबाची व्यथा मांडली. यामुळे उपस्थितांना खड्ड्यांच्या समस्येची तीव्रता जाणवली. कवी मोहन पाटील यांनी 'संकटमोचक आहेत, पक्ष फोडण्यात व्यस्त... नाशिकचे खड्डे किती आहेत मस्त' या उपरोधिक ओळींतून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. त्यांच्या काव्यातून नागरिकांचा रोष व्यक्त झाला आणि रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यावी, अशी सामूहिक अपेक्षा उपस्थित कवींनी व्यक्त केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. गंगाधर अहिरे होते, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून आयटक कामगार नेते राजू देसले यांनी मार्गदर्शन केले.



















