Independence Day at Red Fort: स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावर इतिहास घडणार; पहिल्यांदाच गायलं जाणार पूर्ण 'वंदे मातरम'!

या वर्षीच्या स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवात लाल किल्ल्यावर पहिल्यांदाच ‘वंदे मातरम’ हे राष्ट्रीय गीत गायले जाणार आहे, अशी माहिती संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांन
या वर्षीच्या स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवात लाल किल्ल्यावर पहिल्यांदाच ‘वंदे मातरम’ हे राष्ट्रीय गीत गायले जाणार आहे, अशी माहिती संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. या वर्षीचा सोहळा ‘वंदे मातरम’ गीताच्या १५० व्या वर्धापनदिनासह २०४७ पर्यंत ‘विकसित भारत’ बनवण्याच्या उद्दिष्टात तरुण भारतीयांचे योगदान यावर लक्ष केंद्रित करेल. या सोहळ्यात सुमारे २७ हजार लोक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे, ज्यामध्ये तरुण नवनिर्मितीकार, इंटर्न्स, उद्योजक आणि विद्यार्थी यांचा समावेश असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावर पोहोचताच संपूर्ण ‘वंदे मातरम’ गीत गायलं जाईल, त्यानंतर ते ध्वजारोहण करतील आणि देशाला संबोधित करतील. उपस्थितांना गाण्यात सहभागी होण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने निमंत्रण पत्रिकेत या गाण्याचे बोल छापले आहेत.
या सोहळ्याचे आयोजन ‘वंदे मातरम’च्या १५० व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने आणि युवा शक्ती फॉर विकसित भारत@२०४७ या दोन मुख्य संकल्पनांखाली करण्यात आले आहे. राजेश कुमार सिंह यांनी स्पष्ट केले की, जंतरमंतरवरील अलीकडील घटनांचा विचार न करता ‘युवा शक्ती’ ही संकल्पना स्वतंत्रपणे ठरवली गेली होती. या कार्यक्रमात अनेक क्षेत्रातील तरुणांना आमंत्रित करण्यात आले आहे. राष्ट्रीय नवोपक्रम कार्यक्रमांतर्गत काम करणारे इनोव्हेटर्स, ‘पंतप्रधान इंटर्नशिप योजने’तील उत्कृष्ट इंटर्न्स, विविध सरकारी योजनांचे लाभ घेणारे स्टार्टअप्स, ‘पंतप्रधान कौशल विकास योजना’ आणि ‘स्टार्ट-अप इंडिया सीड फंड’ अंतर्गत चांगली कामगिरी करणारे तरुण, तसेच आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि गणित ऑलिम्पियाड २०२६ मध्ये पदक जिंकणारे १९ विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
लाल किल्ल्यावर सजावटीत ‘वंदे मातरम’ची झलक दिसेल. ज्ञानपथावर NCC चे २,५०० विद्यार्थी आणि ‘माय भारत’चे स्वयंसेवक एकत्र येऊन ‘वंदे मातरम’ची मानवी साखळी तयार करतील. भारतीय हवाई दलाचे ‘Mi-17’ हेलिकॉप्टर ‘वंदे मातरम’च्या १५० वर्षांच्या निमित्ताने एक बॅनर हवेत घेऊन जाईल आणि उपस्थितांवर पुष्पवृष्टी करेल. पार्श्वभूमीतील ‘व्ह्यू-कटर्स’वर भारताच्या आण्विक आणि अंतराळ तंत्रज्ञानातील प्रगतीचे दर्शन घडवले जाईल, तर ‘गार्ड ऑफ ऑनर’ भागात भारताच्या विकसित भारत @२०४७ कडील प्रवासाची प्रचिती देणारी फुलांची सजावट असेल. ‘वंदे मातरम’च्या १५० व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने सरकारने या राष्ट्रीय गीतावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. फेब्रुवारी महिन्यात केंद्रीय गृह मंत्रालयाने विशिष्ट अधिकृत कार्यक्रमांमध्ये या गाण्याचे सर्व ६ कडवे गाण्याबाबतचे नियम जारी केले होते. संसदेने नुकतेच एक विधेयक मंजूर करून राष्ट्रीय गीताला राष्ट्रगीताच्या बरोबरीचा दर्जा दिला आहे, ज्यामुळे राष्ट्रीय गीताचा अवमान करणे किंवा त्यात अडथळा आणणे हा आता फौजदारी गुन्हा ठरेल. या गुन्ह्यासाठी तीन वर्षांपर्यंतचा तुरुंगवास आणि दंडाची तरतूद करण्यात आली आहे. सध्या हा कायदा राष्ट्रीय ध्वज, राष्ट्रगीत आणि संविधानाचे रक्षण करतो.


















