Tourist Vehicle Attack in Igatpuri:हरिहर किल्ल्यावरुन परतणाऱ्या पर्यटकांच्या वाहनावर हल्ला

नाशिक : काही दिवसांपूर्वी भावली धरणावर नाशिकच्या पर्यटकांच्या वाहनावर झालेल्या हल्ल्यामुळे स्थानिक पोलिसांनी इगतपुरी तालुक्यातील पर्यटकांच्या सुरक्षेसाठी विशेष
नाशिक : काही दिवसांपूर्वी भावली धरणावर नाशिकच्या पर्यटकांच्या वाहनावर झालेल्या हल्ल्यामुळे स्थानिक पोलिसांनी इगतपुरी तालुक्यातील पर्यटकांच्या सुरक्षेसाठी विशेष खबरदारी घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, रविवारी सायंकाळी हरिहर किल्ल्यावरून घोटीकडे परतणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलरवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात वाहन चालकाला मारहाण करण्यात आली आणि वाहनाची तोडफोड करण्यात आली. ही घटना घोटी-त्र्यंबकेश्वर मार्गावरील बोरीचीवाडी परिसरात घडली. या प्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागराज जगदीश गिरेगौड (२७, व्यवसाय चालक, रा. हिरेकेनाई, ता. हावेरी, जि. हावेरी, कर्नाटक) हे टेम्पो ट्रॅव्हलर चालक आहेत. नऊ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ते टेम्पो ट्रॅव्हलरमधून कॉलेजच्या विद्यार्थ्यांना पर्यटनासाठी घेऊन हरिहर किल्ल्यावर गेले होते. पर्यटन आटोपून घोटीकडे परतताना बोरीचीवाडी परिसरात काही व्यक्तींनी त्यांच्या वाहनाला अडवले. त्यानंतर चालकाला वाहनातून खाली उतरवून मारहाण करण्यात आली. यावेळी मोटारसायकलवरील व्यक्तींनीही चालकाला मारहाण केली, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या हल्ल्यात संशयितांनी वाहनावर दगडफेक करून वाहनाच्या काचेसह आरशाचे नुकसान केले. वाहनाच्या छताचे आणि मागील भागाचेही नुकसान झाले. या प्रकारामुळे वाहनातील पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. घोटी पोलिसांनी तातडीने कारवाई करत संशयितांना अटक केली आहे. या प्रकरणातील संशयितांमध्ये अजय चंद्र गांगड, आकाश दिलीप जाधव, अक्षय देवराम जाधव, देविदास मधुकर जाधव, अमोल जाधव, गोपाळ जाधव, राहुल जाधव, दत्ता लोणे, साहिल जाधव आणि साई जाधव यांची नावे आहेत. सर्व संशयित बोरीचीवाडी परिसरातील आहेत. घोटी पोलिस ठाण्याचे निरीक्षक विजय शिंदे यांनी घटनास्थळी भेट देत संशयितांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रतीक भिंगारदे, अण्णा गोवृधने, बाळासाहेब आहेर, दीपक सांगळे आणि सनी भवर यांच्या नेतृत्वात सुरू आहे. पर्यटकांच्या वाहनावर झालेल्या या प्रकारामुळे परिसरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.





















